लोकशाहीला वाचविण्यासाठी निर्भय बना

मारेगाव येथे चळवळीची बैठक

     मारेगाव - गत काही वर्षात लोकशाहीच्या मूल्याचे अवमूल्यन होत असताना जनता निमुटपणे सहनशक्ती हरवून सर्व काही सहन करत असल्याने लोकशाही धोक्यात येण्याची चिन्ह स्पष्ट होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही वाचवावी. असे प्रतिपादन पप्पू भोयर यांनी यांनी केले. ते मारेगाव येथील 'निर्भय बनो' या टॅगलाइन खाली सुरू करण्यात आलेल्या जागृत अभियानाच्या बैठकीत बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी निर्भय बनो अभियानाचे साहेबराव जुनगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदू बुटे, कैलास राऊत, मारोती गौरकार, अनंत मांडवकर, ज्योतिबा पोटे, अनामिक बोढे, कुंदन पारखी, प्रकाश कोल्हे, दिगांबर देने यांची उपस्थिती होती.

Nirbhay_banaa_for_save_democracy     सध्या परिस्थितीत राज सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेला गुलाम बनविण्यासाठी होत असल्याने समाजात अस्थिरता वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर शासन कुठलाही निर्णय घेत नसून सर्वसामान्याचे हक्क अधिकार संपवून हुकूमशाही पद्धतीने व्यवस्था वागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, त्यातून मुक्त होण्यासाठी 'निर्भय बनो' हे कुठल्याही पक्षाचे वा कुठल्याही सामाजिक संघटनेचे आंदोलन नसून हे सर्व सामान्य जनतेचे अभियान आहे, असे मत मारेगाव येथील बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केले.

    अभियान वाढविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेऊन लोकशाही शाबूत ठेवावी तरच मानवता टिकेल. यासाठी ज्यांना असे वाटते त्यांनी निर्भय बनो आंदोलनात सहभागी होऊन निर्भय बना चळवळीत सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.