देशाचे दुश्मन
Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar
देशाचे दुश्मन, लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
म. जोतिराव फुले यांच्या स्मारकाचा ठराव पुणे म्यु. पुढे असल्यामुळे 'टिळकटलेले' बरेचसे पत्रकार म. जोतिरावांविषयी आपले अज्ञान मुद्दाम प्रगट करू लागले आहेत. ब्राह्मणी गुलामगिरीचं मंडन करणारे आणि सर्व जातीवर ब्राह्मणी वर्चस्व राखू पाहणारे
बुटलेरिवाणाचे विप्र वड्डु,
'जोतिरावांचे स्मारक करण्यास योग्य अशी जागा कोल्हापूर आहे' अशी त्यांची टवाळी करून पुणेकरांनी त्यांचे स्मारक काय म्हणून करावे' असा आम्हाला सवाल टाकतात. दारूच्या पिंपात अखंड डुंबणाऱ्या दारूड्याप्रमाणे बरळणारे, दुसरे भटाळे बाटगे 'टिळक- चिपळूणकराशिवाय पुण्याला काय किंवा अखिल हिंदुस्थानला काय, स्मारकरूपाने ललामभूत होण्याला दुसरे कोणी लायकच नाहीत' असे म्हणून 'म. फुले, क्षत्रिय कुलावतंस शिवाजी महाराज, देशसेवेकरिता अमराचे फकीर बनलेले देशबंधू चित्तरंजनदास यांच्या स्मारकांना प्रत्येकी शंभर शंभर रुपड्या देऊन स्मारकाचे खूळ मोडून टाकावे,' असे म्हणून म. फुले, शिवाजी महाराज, देशबंधुदास यांची टवाळी करतात. कोठे बाबू चित्तरंजनदास आणि कोठे टिळकांसारखे बाबू निपटरंजनदास ! कोठे महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर आचंद्रार्क विराजमान होणारे रणगाजी शिवबा आणि कोठे भटी पंचपात्रित खडबडणारा भटांचा टिळकोबा, कोठे मृत महाराष्ट्रातून कडव्या सत्यनिष्ठेचा झंझावात उत्पन्न करणारा प्रखर प्रभावी फुले महात्मा आणि कोठे महाराष्ट्राच्या हाती पुराणांच्या कापुसवाती देणारा चिपळूणकरी टिळक दुरात्मा !! कोंबडीच्या खुराड्यात आर्यावर्तांची अतिव्याप्ती सामाविणारे पाटलोण पंडित, रा. जवळकरांचे पुस्तक वाचून पाहतील आणि स्मृती श्रुतिंची ढापणे डोळ्यावरून काढून महाराष्ट्राला निरखतील तर त्यांना टिळक-चिपळूणकरांपेक्षा म. फुल्यांचा कर्तबगार पगडा ब्राह्मणेतरांवरच काय ब्राह्मणांवर देखील पडलेला आहे हे कबूल करावे लागेल. कळकटलेले कंकर, टिळकीछाप दारूने धुंद झालेले आहेत, त्यांना महात्मा जोतिरावांची योग्यता कळणार नाही, पण शिवाजीचा महाराष्ट्र टिळक-चिपळूणकरी अत्याचार लाथेखाली तुडवीत म. जोतिरावांच्या जयजयकाराने आसेतुहिमाचल भरतखंड हादरून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. म. जोतिरावांनी उभारलेल्या सत्यशोधकी गदेखाली टिळक - चिपळूणकरी सैतानशाहीचा हात असलेला चेंदामेंदा महाराष्ट्रीय वर्तमानपत्राच्या कलमाप्रमाणे प्रत्ययास येत आहे. यापेक्षा म. जोतिरावांच्या योग्यतेसंबंधी बलवत्तर पुरावा कोणता पाहिजे ?
टिळक - चिपळूणकर मेले. म. जोतिरावही आपल्यातून गेले. टिळक-चिपळूणकर देशाला मारून मेले. म. जोतिरावांच्या पायधुळीने पावन झालेल्या मराठ्यांच्या महाराष्ट्र महात्म्याचे अद्वितीयत्व राष्ट्रेतिहासाला बिनशर्त लिहावयास लावील हे ब्राह्मणांनी जाणून असावे. देशाकरिता आणि धर्माकरिता म. जोतिरावांनी जन्मभर हालअपेष्टा भोगून महाराष्ट्रावर, अखिल हिंदूंवर जे ऋण करून ठेवले आहे, ते ऋण महाराष्ट्राने, अखिल हिंदूने म. जोतिरावांकरिता आणि त्यांच्या उज्ज्वल ध्येयाकरिता मेल्याविना फिटणार नाही. शिवाजीचा महाराष्ट्र मरणाची किंमत धर्माच्या रणखंदल दंगलीत काय समजतो याची साक्ष इतिहास देत आहे.
हे पुस्तक छोटे असले तरी त्याच्या प्रसिद्धीकरणाचे कारण फारच मोठे आहे. महाराष्ट्रात भाराभर पुस्तके आणि खंडोगणती लेखक नागवे सत्य लपवून जिकडे घुगऱ्या तिकडे उदो- उदो करण्यास तयार होतात. म. जोतिरावांच्या 'गुलामगिरी' पुस्तकानंतर आज पन्नास वर्षांनी या निर्भिड पुस्तकाचा महाराष्ट्राला लाभ होत आहे. कलमकसाई ब्राह्मणांच्या काळजावर जर घाव घालायचा असेल तर सत्यशोधकी कलमबहाद्दरांनी आपल्या लेखणीला किती तीक्ष्ण धार लावावी लागते याचे ढळढळीत उदाहरण हे पुस्तक आहे. कै. बळवंतराव टिळक यांच्या मरणानंतर आज चार-पाच वर्षांनी या पुस्तकाचा जन्म व्हावा आणि हे। पुस्तक वाचण्यास टिळक जगू नयेत याबद्दल आम्हाला दुःख होत आहे. ते जर आज जिवंत असते तर आपल्या सर्व पापाचे प्रायश्चित्त घेऊन हिंदमातेचे उतराई होण्याकरिता त्यांनी म. जोतिरावांच्या प्रतिमेपुढे पगडीसह लोटांगण घातले असते. मृत्यूने त्यांना दगा दिला आणि बिचाऱ्याला रावबाजी रघुनाथ, बाळाजीपंत नातू, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या पंक्तीत कायमचे बसविले. सर्व दुर्जन दुष्टांना परमेश्वराने क्षमा करून शांती द्यावी असे त्या दयाघन देवाजवळ अखिल सत्यशोधकांतर्फे आम्ही प्रार्थना करितो.
जेधे मॅन्शन,
पुणे ता.२५ जुलै १९२५.
केशवराव जेधे
प्रकाशक