Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar - बुद्ध आणि कार्ल मार्क्स - Page 3 मुख्य मजकूराकडे जा

बुद्ध आणि कार्ल मार्क्स

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar

Page 3 of 7
24 नोव्हेंबर 2021
Book
5,7,3,2,1,,

बुद्ध आणि कार्ल मार्क्स - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

६. साधनांचे मूल्यमापन

    आपण आता साधनांच्या मूल्यमापनाकडे वळूया. कोणाची साधने श्रेष्ठ असून ती साधने दीर्घकाळ टिकून राहतील, हे आपण विचारात घेतले पाहिजे. तथापि, दोन्ही बाजूस काही गैरसमज आहेत. ते काढून टाकणे आवश्यक आहे.

    हिंसेचा मुद्दा घ्या. हिंसेच्या केवळ कल्पनेने ज्यांचा थरकाप उडतो असे अनेक लोक आहेत. परंतु ही केवळ एक भावना आहे. एकंदरीत पाहता हिंसेवाचून चालू शकणार नाही. बिगर-साम्यवादी देशांमध्ये देखील खुन्याला फाशी देण्यात येते. फाशी देणे हे हिंसा करण्यासारखे नाही काय? बिगरसाम्यवादी देश बिगर-साम्यवादी देशाबरोबर युद्ध करतात. लाखो लोक ठार केले जातात. ही हिंसा नाही काय? जर एखाद्या संपत्तीच्या मालकाला, जर त्याची मालकी बाकीच्या लोकांना दुःखात लोटत असेल तर, का ठार करण्यात येऊ नये? संपत्तीच्या मालकाचा अपवाद करण्याचे कोणतेही कारण नाही. खाजगी संपत्ती पवित्र म्हणून कोणी का मानावी ?

Buddha ki Karl Marx Book Written by Dr Babasaheb Ambedkar      बुद्ध हिंसेच्या विरूद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूला होता. जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशालीचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्याच्या संवादातून उत्तमरीत्या दर्शविली गेली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करीत असल्याचे समजल्यावरून सिंह सेनापती त्याच्याकडे गेला व त्याने असे विचारले.

    'भगवान अहिंसेचा उपदेश करतात. याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये असा उपदेश करतात काय? आमच्या बायका-मुलांचे व आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये, असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून सोसावी हानी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय ?

    बुद्धाने उत्तर दिले, “मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरपराधी माणसाची सुटकादेखील झाली पाहिजे. न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमलबजावणी करीत असतो, त्याला अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरतात तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरू करता त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल, पण ते स्वार्थी हेतूंसाठी असता कामा नये.

    प्रा. जॉन ड्युई यांनी आवर्जून मांडलेल्या करणांसारखीच हिंसेच्या विरोधात अर्थात इतरही कारणे आहेत. जे असे सांगता की, साध्य हे साधनांना योग्य ठरवते हे नैतिकदृष्ट्या विकृत तत्त्व आहे, त्यांचा समाचार घेताना ड्यईंनी योग्यच विचारले आहे की, साध्य जर साधनांना योग्य ठरवू शकणार नसेल तर कोण योग्य ठरवू शकेल? केवळ साध्यच असे अस शकते की सांधनांना योग्य ठरवू शकते.

    साध्यच केवळ साधनांना योग्य ठरवू शकते, यास बहुधा बुद्धाने मान्यता दिली असती. दुसरी कोणती शक्यता होती? आणि जर साध्याने हिंसा ही योग्य ठरविली असेल तर नजरेसमोरचे 'साध्य' साध्य करण्यासाठी हिंसा ही न्याय्य साधन असेल, असे तो म्हणाला असता. जर बळ हे त्या साध्यासाठी एकमेव साधन असते तर संपत्तीच्या मालकांना बळाच्या वापरातून त्याने निश्चितच वगळले नसते. अशा प्रकारे साध्यासाठी असलेली त्याची साधने ही वेगळी होती असे आपणास दिसून येईल. प्रा. ड्यंई यांनी दर्शविल्याप्रमाणे, हिंसा हे केवळ बळाचा वापर करण्याचे दुसरे नाव आहे. आणि जरी हिंसा ही सृजनात्मक प्रयोगनासाठी वापरणे आवश्यक असले तरी ऊर्जा म्हणून बळाचा वापर आणि हिंसा म्हणन बळाचा वापर यामध्ये भेद हा केलाच पाहिजे. एक साध्य प्राप्त करताना जी गोष्ट नष्ट करावयाचे योजले असेल तिच्या बरोबर असलेल्या इतर अनेक साध्यांचाही नाश अंतर्भूत असतो. बळाचा वापर अशा प्रकारे नियंत्रित असला पाहिजे की एक वाईट गोष्ट नष्ट करताना शक्य होतील तितकी इतर अनेक साध्ये वाचवली जावीत. बुद्धाची अहिंसा ही जैन धर्माचा संस्थापक महावीर त्याने उपदेशिलेल्या अहिंसेसारखी टोकाची नव्हती. त्याने फक्त ऊर्जा म्हणून करण्यात येणाऱ्या बळाच्या वापराला परवानगी दिली असती. अहिंसा हे अनिबंध तत्त्व आहे असा प्रचार साम्यवादी करतात. बुद्धाचा त्यास सक्त विरोध होता.

    हुकुमशाहीच्या बाबतीत सांगावयाचे तर बुद्धाला कसलीच हुकूमशाही मान्य झाली नासती. तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच पावला. त्याच्या जीवनकाळात १४ राजसत्ताक राज्ये व ४ प्रजासत्ताकवादी राज्ये होती. तो शाक्यांपैकी होता आणि शक्यांचे राज्य प्रजासत्ताक होते. वैशाली हे त्याचे दुसरे घर होते, ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशालीबद्दल अत्यंत प्रेम वाटप असे. महापरिनिर्वाणाआधीच त्याचा वर्षावास त्याने वैशालीत घालवला. हा वर्षावास पूर्ण झाल्यावर त्याने त्याच्या इच्छेनुसार वैशाली सोडण्याचे व अन्यत्र जाण्याचे ठरविले. काही अंतर चालून गेल्यावर त्याने वैशालीकडे मागे वळून पाहिले व आनंदाला म्हणाला, “तथागताला वैशालीचे हे अखेरचे दर्शनं आहे." इतके त्याला या प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटप होते. तो पूर्णपणे समातावादी होता. सुरूवातीला भिक्षू, स्वतः बुद्धदेखील, चिंध्यांपासून बनविलेली वस्रे वापरीत. सरंजामदारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता. पुढे महाभिषक जीवकाने संपूर्ण कापडापासून बनविलेले एक वस्र बुद्धाला (प्रेमाने) स्वीकारायला लावले. बुद्धाने तत्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षूनाही लागू केला.

     भिक्षुणीसंघात सामीला झालेली बुद्धाची माता प्रजापती गौतमी हिने एकदा बुद्धाला थंडीची बाधा झाल्याचे ऐकले. तिने लगेच त्याच्यासाठी एक लोकरी पट्टा विणायला सुरूवात केली. तो विणून झाल्यावर ती तो बुद्धाकडे घेऊन गेली व तिने त्याला तो घालण्याची विनंती केली. परंतु जर ते दान असेल तर ते सर्व संघाला दिलेले दान असले पाहिजे, ते संघाच्या कुणा व्यक्तिगत सदस्यासाठी असता कामा नये, असे म्हणून त्याने तो स्वीकारण्यास नकार दिला. तिने पुनःपुन्हा विनवणी केली, परंतु त्याने तो घेण्यास नकार दिला.

    भिक्षुसंघाची रचना अत्यंत समतावादी होती. बुद्ध स्वतः केवळ भिखूपैकी एक होता. तसेच तो संसदेच्या सदस्यांमध्ये पंतप्रधानासारखा होता. तो कधीच हुकूमशहा नव्हता. संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कोणाला तरी नेमावे अशी त्याच्या मृत्युपूर्वी त्याला दोनदा विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने हुकूमशहा होण्यास नकार दिला व हुकूमशहा नेमण्यासही नकार दिला.