भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार
Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar book by Dr. B. R. Ambedkar
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
( डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. ९ मे १९१३ रोजी कोलंबिया विद्यापीठात मानववंश-शास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळासमोर वाचलेला निबंध. )
मानवी संस्कृतीत महत्वाचे स्थान असलेल्या अनेक वस्तूंची प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शने आपणापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेली असावी असे मला वाटते. परंतु 'मानवी संस्थाचे प्रदर्शन' ही कल्पना आपणाप की फारच थोडयांना रूचेल. 'मानवी संस्थांचे प्रदर्शन' ही कल्पनाच चमत्कारिक आहे: काहींना तर ही कल्पना भयानकही वाटण्याचा संभव आहे तथापि मानववंश-शास्त्राचे विद्यार्थी या नात्याने माझ्या या नाविन्यपूर्ण कल्पनेने तुम्हास धक्का बसणार नाही अशी मला आशा वाटते. कारण मूलतः ही कल्पना चमत्कारिक नाही आणि निदान तुम्हाला तरी तशी वाटू नये.
तुम्ही सर्वांनी पांपीसारख्या पुरातन एैतिहासिक स्थळाला भेट देऊन मोठया जिज्ञासेने गाईडच्या चंचल वाणीतून भग्नावशेषांचा इतिहास ऐकला असावा, असे मी गृहित धरून चालतो. माझ्या मते मानववंश शास्त्राचा विद्यार्थी हा एका अर्थी बराचसा या गाईंडांसारखाच असतो. त्याच्याप्रमाणेच हाही मनुष्याला शक्य त्या वास्तववादी दृष्टिकोणातन सामाजिक संस्थाचे निरीक्षण करतो. आणि त्यांची कार्ये व निर्मिती यांचा शोध घेतो. बहुधा स्वशिक्षणाच्या जिज्ञासेपोटी व गंभीर वृत्तीनेच हे तो करीत असतो.
प्राचीन व अर्वाचीन समाजाशी संबंधित असलेल्या या अभ्यासमंडळातील बहुतेक विद्यार्थी मित्रांनी आजपर्यंत प्राचीन किंवा अर्वाचीन अशा त्यांच्या आवडीच्या मानवी संस्थासंबंधी विचारांची याच धर्तीवर सुबोध मांडणी केलेली आहे. तशीच आज माझीही पाळी आहे. माझ्या शक्तीनुसार 'भारतातील जाती, त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार' या विषयावरील निबंध मी आपल्या विचारार्थ आजच्या या संध्याकाळच्या बैठकीत मांडत आहे.
मी हाताळत असलेला विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे याची जाणीव आपल्याला करून देण्याची आवश्यकता नाही. माझ्यापेक्षा अधिकारी व्यक्ती व समर्थ लेखनी जाती संस्थेच्या गूढतेचे पटल दूर सारण्याच्या उद्योगात रत झालेल्या आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा जातिसंस्थेचा प्रांत 'अज्ञात, नसला तरी अजूनही अस्पष्टच आहे. जातिसंस्थेसारख्या जख्ख संस्थेच्या अनेकांगी फसवेपणाची मला पूर्णतः जाणीव आहे; परंतु तिला अज्ञाताच्या प्रदेशात ढकलण्याइतका मी निराशावादी नाही. कारण तिच्या उत्पत्तीसंबंधी माहिती करून घेता येऊ शकते अशी माझी धारणा आहे. व्यवहारशः आणि तत्वशः दोन्ही दृष्टीने जातीची समस्या अतिशय व्यापक आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिल्यास जातिसंस्था विस्तृत परिणाम घडवून आणते असे दिसून येते. वस्तुतः ती एक प्रादेशिक समस्या असली तरी विस्तृत प्रमाणात गोंधळ माजविण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. कारण जोपर्यंत भारतात जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत हिंदू आंतरजातीय विवाह करण्यास धजणार नाहीत, किंवा अहिंदूची कोणताही सामाजिक संबंध ठेवणार नाहीत. आणि जर का हिंदू स्थलांतर करून परदेशात गेले तर भारतातील जातींची ही समस्या एक जागतिक समस्या झाल्याशिवाय राहणार नाही. तात्विक दृष्टीने पाहता. आजपर्यंत अनेक मोठमोठया विद्वानांनी प्रेमापोटी तिचे मूळ शोधण्यासाठी परिश्रम घेतले परंतु तिने त्या सर्वांची अवहेलनाच केलेली आहे. अशा परिस्थितीत जातिसंस्थेचा यथासांग ऊहापोह करणे मला तरी शक्य दिसत नाही. म्हणूनच उगम, घडण आणि प्रसार या मुद्यांपुरते मी स्वतःला मर्यादा घालून दिली नाही तर वेळ, जागा आणि बुद्धीची झेप हे सर्व मिळून माझ्या अपयशाला कारणीभूत होतील. अशी मला भीती वाटते. ही मर्यादा मी कसोशीने सांभाळणार आहे आणि माझ्या प्रबंधातील एखाद्या मुद्याच्या स्पष्टीकरणासाठीच वेळप्रसंगी विषयबाह्य माहितीचा उपयोग करून घेणार आहे.