बहुजन नायक कांशीराम
Bahujan Nayak Kanshiram
बहुजन नायक कांशीराम - बापू राऊत
शिख धर्मात पंचप्यारेंना खूप महत्व आहे.या पंचप्यारेंची एक गोष्ट सांगितली जाते.त्याकाळात शिख धर्माला मुघल सम्राटाकडून धोका होता. त्यामुळे शिख धर्माला वाचविण्यासाठी शिखांच्या सभा होत असत. इस्लामच्या वाढीसाठी शिखांचे नववे गुरु तेघबहादुर हा एक अडथळा आहे असे समजुन औरंगजेबाने गुरु तेघबहाबहाद्दर याना ठार मारले. पित्याच्या मृत्यू नंतर गुरु गोविंदसींगावर शिख धर्माच्या रक्षणाची जबाबदारी आली. शक्तीशाली मोघल सम्राटापासून शिख धर्माचा टिकाव करण्यासाठी मरणास तयार असणारी माणसे गुरु गोविंद सिंगाना हवी होती. त्यांनी शिख समुदायाची बैठक बोलावली व शिख धर्माच्या रक्षणासाठी आताच्या आता मरणास तयार असणाऱ्याने समोर येण्याचे आवाहन केले. तेव्हा समुदायातन एक तरुण हात वर करीत उठला. त्याला गुरु गोविंदसिंगाने आत नेले. दुसऱ्या क्षणी रक्ताने माखलेली तलवार बाहेर घेऊन येत आता परत मरणास कोण तयार आहे ? असे पुन्हा आवाहन केले, तेव्हा एक तरुण हात वर करीत उठला त्यालाही त्यांनी आत नेले व परत रक्ताने माखलेली तलवार दाखवत परत आवाहन केले, असे एकुन पाच जण मरणास तयार झाले व नंतर या पाचही जनाना गुरु गोविंदसिंगानी आतून बाहेर काढीत धर्म रक्षणासाठी मरणास तयार असणाऱ्या पाचही जणाना परमेश्वराचे प्यारे म्हणुन पंचप्यारे घोषित करण्यात आले. मरणास तयार असलेल्या लोकांच्या बळावर अफाट व शक्तीशाली मोघलाकडून शिख धर्म सुरक्षित राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी अशाच पंचप्यारेंची गरज होती. आंबेडकरी चळवळीतील कांशीरामजी हे अशाच पंचप्याऱ्यांपैकी एक होते. मा.कांशीराम यांचा जन्म पंजाबमधील रोपड जिल्ह्यातील ख्वासपूर गावात एका रामदासीया शिख कदंबात 15 मार्च 1934 रोजी झाला. त्यांचे वडील गरीब शेतकरी होते. त्यांच्या एकूण सात भावंडात मा. कांशीराम हे सर्वात मोठे होते. त्यांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन 1956 साली बी.एस्सी पदवी प्राप्त केली. दलित कदंबात जन्म झाल्याने कांशीरामजींना लहानपनी तिरस्काराचा व अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्रातील पुणे येथे 1958 साली केंद्रिय शासनाच्या एक्सप्लोसिव्ह रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी या खात्यामध्ये शास्त्रीय सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1962-63 साली मात्र त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले.
मा.कांशीरामजीनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अॅनिहिलेशन ऑफ कॉस्ट हे पुस्तक रात्रभर जागून तीन वेळा वाचून काढले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पुस्तकांचे वाचन केले. डॉ.बाबासाहेबांच्या पुस्तकातून त्याना मनुवादी व्यवस्थेचे मर्म तर कळलेच पण त्यातुन कांशीरामजीना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भावी सामाजीक, राजकीय व आर्थिक विकासाचा मार्ग व अॅक्शन प्लॅन मिळाला व ते साध्य करण्यासाठी आजन्म अविवाहित राहण्याचा निश्चय केला. आयुष्यात लग्न न करण्याची शपथ घेत आई - वडिल,भाऊ - बहीण यांचाही सहवास सोडला एवढेच नव्हे तर यापुढे मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमात न जाण्याचे ठरविले. माझे केवळ एकच ध्येय आणि ते म्हणजे डॉ.बाबासाहेबांचे राहिलेले अधूरे स्वप्न पुर्ण करणे.दलित मागास कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी एक संघटना काढावी असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. उच्चवर्णीय अधिकाऱ्याकडून दलित कर्मचाऱ्यावर होणारे अत्याचार थांबविणे आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणे या सुरुवातीच्या उद्देशाने त्यांना संघटना काढावयाची होती. त्यासाठी मा. कांशीरामजी यांनी समविचारी व्यक्तीशी संपर्क साधणे सुरु केले. कांशीराम हे त्यानंतर एक व्यक्ती म्हणून कधी दिसलेच नाही. चालता फिरता ते एक मिशन होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडविणे हे त्यांच्या मिशनची मुख्य भूमिका होती. त्यासाठी त्यांनी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत भ्रमण केले. देशभर विस्कटलेल्या दलितांना त्यांच्या हक्कासाठी एकच पक्ष व नेत्याच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मा.कांशीरामजी देशभर भ्रमण करीत फिरत असत. अशाच एका भ्रमणात त्याना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला. तेव्हापासुन ते आजारीच राहिले व दि. 9 ऑक्टोबर 2006 ला त्यांचे दु:खद निधन झाले.त्यामूळे त्यांचा लाखो लोकांना सोबत घेऊन हिंदू धर्माला दुर सारुन बौध्द धम्म स्विकारण्याचा निर्धार पुर्ण होऊ शकला नाही. अल्पायुष्यामुळे कांशीरामजीना जाहीरपणे बौध्द धम्म स्विकारता आला नसला तरी त्यांच्या रोमारोमात बौध्द धम्म भिनलेला होता. माझ्या आजारामुळे जरी मला बौध्द धम्म स्विकारता आला नसला तरी माझे अंत्यसंस्कार हे हिंद पध्दतीने नव्हे तर बौध्द पध्दतीनेच झाले पाहिजे असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बजावून सांगितले होते व त्यांच्या इच्छेचा शेवट हा बुध्दम सरणम गच्छामी, संघम सरणम गच्छामी असाच तथागत गौतम बुध्दाला शरण जाऊन झाला.