- प्रेमकुमार बोके
९४ वे तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमधे ३-४-५ डिसेंबर २०२१ ला होवू घातले आहे.डाॕ.जयंत नारळीकर हे या संमेलनाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत.हे संमेलन जरी मराठी माणसांच्या नावाने होत असले तरी संमेलनाची रुपरेषा पाहता संपूर्ण साहित्य संमेलनावर एकाच विशिष्ट जातीच्या लोकांनी कब्जा केलेला दिसून येतो.काही बहुजनही आहेत; पण ते फक्त नावापुरते ,चटणीसारखे तोंडी लावायला ! छगन भुजबळ यांच्यासारख्या बहुजन समाजातील ताकदवान माणसाला स्वागताध्यक्ष करून त्यांच्या हातून प्रचंड पैसा गोळा करुन घ्यायचा आणि आपली हौस भागवून घ्यायची असा हा खटाटोप आहे. छगन भुजबळ हे महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने चालणाऱ्या समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. परंतु मराठी साहित्य संमेलनाविषयी महात्मा फुले यांचे काय मत होते हे कदाचित त्यांना माहित नसावे ! आणि माहित असले तरी फुलेंच्या मताकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नसावी. परंतु १८८५ मधे महात्मा फुले साहित्य संमेलनाविषयी न्या.महादेव गोविंद रानडे यांना लिहिलेल्या पत्रात जे बोलले, ते आजही तंतोतंत लागू पडते हे भुजबळ साहेबांना सांगावेसे वाटते.
बहुजन समाजात अत्यंत विद्वान आणि सर्वोच्च शिखरावर पोहचलेले अनेक प्रतिभावंत साहित्यीक होते आणि आजही आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिशा देणारी ७७ पुस्तके लिहिली; परंतु ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होवू शकले नाही. मृत्यूंजय सारखी अजरामर कलाकृती निर्माण करणारे शिवाजी सावंत, बलुतं सारखी उत्कृष्ट कादंबरी लिहिणारे दया पवार हे ही अध्यक्षपदाच्या लायक समजले गेले नाही. सध्या हयात असलेले व ५० पेक्षा जास्त वैचारीक आणि वास्तववादी पुस्तकांची निर्मिती करणारे थोर साहित्यीक डाॕ. आ. ह. साळुंखे, इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख, कवीवर्य डाॕ. विठ्ठल वाघ, डाॕ.यशवंत मनोहर, डाॕ. अशोक राणा, डाॕ. प्रतिमा इंगोले यांच्यासारखी अनेक प्रचंड प्रतिभाशाली माणसे बहुजन समाजात असतांना ते मात्र अध्यक्ष होवू शकत नाही याला काय म्हणावे ? कोणी काहीही म्हणो, हा पूर्णपणे जातीयवाद आहे आणि तो ठरवून नियोजनपूर्वक केला जातो हे बारकाईने अभ्यास करणाऱ्यांच्या सहज लक्षात येते. मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांच्याच नावे का ? असे प्रश्न विचारायचे नसतात. कारण असे प्रश्न विचारणारा जातीयवादी ठरत असतो. त्यामुळे बहुजन समाजातील साहित्यीकांनी आता तरी हे षडयंत्र ओळखले पाहिजे आणि महात्मा फुलेंनी १८८५ मधे साहित्य संमेलनाविषयी दिलेला महत्वपूर्ण इशारा व मराठी साहित्य संमेलनावर टाकलेला बहिष्कार या गोष्टी ध्यानात घेवून येणाऱ्या काळात अभ्यासपूर्वक आपली कृती निर्धारीत केली पाहिजे.
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, ३० नोव्हेंबर २०२१