डॉ राजेंद्र सानप ९४२००१९५९७
छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महान किर्तिवंत राजे आणि लोककल्याणकारी समाजसुधारक होते. त्यांनी अस्पृश्यता निवारण, शिक्षण प्रसार आणि आरक्षणाचे जनक म्हणून शाहू महाराज यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे पैलू या लेख रूपात मांडण्याचा प्रयत्न आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव 'यशवंतराव जयसिंगराव घाटगे' असे होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण 'शाहू' असे केले. त्यांनी १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाची छत्रपती महाराज म्हणुन सुत्रे हाती घेतली.

सामाजिक सुधारणा आणि आरक्षण
शाहू महाराज हे शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांचे कैवारी होते. त्यांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी ५०% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि दलितांना समान हक्क मिळवून दिले. जातिप्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी कायदे व जनप्रबोधन धोरण राबवले.
शिक्षण प्रसार कार्य
शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. गोरगरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात राहता यावे, म्हणून त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली. शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या कार्यामुळेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (खड्डचड) च्या वतीने त्यांचा 'दूरदृष्टी असलेले समाजसुधारक' असा गौरव केला जातो.
शेती आणि उद्योग विकास कार्य
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी १९०७ मध्ये राधानगरी धरणाच्या (लक्ष्मी तलाव) बांधकामाला सुरुवात केली, ज्यामुळे कोल्हापूर सिंचनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी शाहुपुरी आणि जयसिंगपूर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांची निर्मिती केली. कला आणि क्रीडा क्षेत्राला राजाश्रय शाहू महाराजांना कुस्तीची प्रचंड आवड होती. त्यांनी अनेक मल्लांना (पैलवानांना) राजाश्रय दिला, ज्यामुळे कोल्हापूरला 'कुस्तीची पंढरी' म्हणून ओळखले जाऊ लागले. याशिवाय संगीत, नाटक, आणि चित्रकला यांनाही त्यांनी भरघोस मदत करून पाठबळ दिले. शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी वेचले. या लोककल्याणकारी कार्यामुळे शाहू महाराजांना कानपूरच्या 'कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना १९१९ मध्ये 'राजर्षी' (राजे + ऋषी) ही पदवी बहाल केली. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी लावलेले समतेचे आणि पुरोगामी विचारांचे रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांची जयंती (२६ जून) हा दिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या १५२व्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !