"दिवाळी - बळीमहोत्सव"

     दिवाळी हा सण भारताच्या बहुतांश भागांतून तर साजरा केला जातोच,पण त्याबरोबरच भारतीय लोक जगातील ज्या विविध देशांतून स्थलांतरित झाले आहेत आणि तेथे तात्पुरते वा कायमचे वास्तव्य करीत आहेत,त्या त्या ठिकाणिही तो साजरा केला जातो.हा सण अतिशय लोकप्रिय असा असून तो आपल्या संस्कृतीमधील अनेक घटनांशी संबंधित असल्यामुळे अनेक सणांचा एक समुच्चय असे त्याचे स्वरूप बणले आहे.

     आपल्याकडे ऋतूंची गणना करतांना सहा ऋतू मानण्याची एक पद्धत आहे.प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिण्यांचा मानला जातो.या गणनेनुसार आश्विन आणि कार्तिक या दोन महिण्यांचा मिळून शरद ऋतू मानला जातो.हा ऋतू सफलतेचे,समृद्धीचे आणि स्वप्नपूर्तीचे प्रतिक बनला आहे.प्राचीन भारतात शरद ऋतूपासून नव्या वर्षाची गणना करण्याची पद्धत होती.म्हणूनच 'जीवेत् शरद: शतम्' अशी सदिच्छा देण्याची प्रथा आपल्याकडे होती आणि आहेही.या ऋतूमध्ये पावसाळ्याची तीव्रता संपलेली असते.आकाश निरभ्र झालेले असते.नद्यांचे पूर ओसरल्यामुळे त्यांचे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक बनलेले असते.महत्वाची गोष्ट म्हणजे खरीपाची बरीच पिके निघालेली असतात वा निघण्याच्या बेतात असतात.याचा अर्थ हा वर्षातील पहिल्या सुगीचा आणि परिपक्वतेचा काळ असतो.त्यामुळे समाधानाचे वातावरण पसरलेले असते.स्वाभाविकच,आनंदोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हा काळ अनुकूल असतो. विविध पक्वान्ने,नवे कपडे,दिपांच्या रांगा इ. मार्गांनी लोक हा आनंद व्यक्त करतात.

Diwali_-_Balimhotsav      महाराष्ट्रामध्ये शेतकर्याला बळीराजा म्हटले जाते.हा शेतांमधील सुगीचा काळ असल्यामुळे या काळात भारतीयांचा प्रेरणापुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणे स्वाभाविक आहे.खरे तर दिवाळीचा हा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळीमहोत्सव साजरा करण्याचा आहे. त्याचे मुळचे स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आले आहे.सध्या साजर्या केल्या जाणार्या दिवाळीमध्येही कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही बलीप्रतिप्रदा म्हणून साजरी केली जाते आणि कार्तिक शक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहिण भावाला ओवाळताना 'इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो' अशी सदिच्छा अंत:करणपूर्वक व्यक्त करते.याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण असलेला 'ओणम्' साजरा केला जातो,तशेच दिवाळीचेही स्वरुप आहे.

     आश्विन कृष्ण द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस होय.या द्वादशीला 'गोवत्सद्वादशी' वा 'बसुबारस' असे म्हणतात.या दिवशी गाय आणि वासरू यांची पुजा करण्याची पद्धत आहे.या काळात ज्याप्रमाणे शेतांमधील धान्य घरी आलेले असते,त्याप्रमाणे दूधदुभतेही विपूल प्रमाणात मिळत असते.कृषीसंस्कृती आणि पशुपालनसंस्कृती यांचा निकटचा संबंध आहे.स्वाभाविकच,दिवाळीच्या या पहिल्या दिवशी आपल्याला दूधदुभते देणार्या गायीगुरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते शिवाय कृष्णाचा गायी आणि वासरे यांच्याशी जो जिव्हाळ्याचा संबंध होता,त्याचे स्मरणही या निमित्ताने केले जाते.

     आश्विन कृष्ण त्रयोदशीला 'धनत्रयोदशी' म्हटले जाते.माणसाला आनंदाने उपजीविका चालविण्यासाठी धनाची आवश्यकता असतेच.ते एक अतिशय महत्वाचे साधन आहे.कष्ट करून योग्य मार्गाने मिळविलेले धन हे मानसाला सुरक्षितता,स्वावलंबन,स्वातंत्र्य आणि आनंद देणारे असते.अशा धनाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे,हा धनत्रयोदशीचा अभिप्रेत अर्थ आहे.या दिवसाचे एक वेगळे महत्वही आहे.वैदिक परंपरेमध्ये दक्षिण दिशा अशुभ मानण्यात आली आहे.यामागे एक सांस्कृतिक इतिहास आहे.वैदिक लोक आणि त्यांना विरोध करणारे बळी वगैरेंचे अनुयायी यांच्यामध्ये एक दीर्घकाळ संघर्ष चालू होता.बळीचे अनुयायी दक्षिणेकडे सरकले होते.ते यज्ञयागांना विरोध करणारे होते.युद्धे होत,तेव्हा ते दक्षिणेकडून हल्ले करीत असत.वैदिकांना या हल्ल्यांची भिती वाटत असे.म्हणून ते भितीपोटी दक्षिण दिशेला अशुभ मानू लागले होते.दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा लावू नये,अशी प्रथा रूढ करण्याइतका दक्षिण दिशेचा धसका त्यांनी घेतलेला होता.धनत्रयोदशीच्या दिवशी जाणीवपूर्वक दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात.याचा अर्थ हा दक्षिण दिशेचा आणि तिकडे राहणार्या अवैदिक लोकांचा गौरव करण्याचा उत्सव ठरतो.

     दिवाळीच्या सणामध्ये आश्विन कृष्ण चतुर्दशी ही 'नरक चतुर्दशी' या नावाने प्रसिद्ध आहे.प्राचीन भारतात नरक नावाचे अनेक राजे होऊन गेले आहेत. त्यांच्यापैकी वैदिक इंद्राचा विरोधक असलेला अतिशय सामर्थशाली,गुणसंपन्न आणि भ्रामक कर्मकांड वगैरेंना नाकारणारा एक महान राजा होऊन गेला आहे.तो राजा इंद्राच्या संस्कृतीपेक्षा पर्यायी अशी एक निकोप संस्कृती जपणारा होता.नरक चतुर्दशी हे नाव या राजाच्या नावावरूनच प्राप्त झाले आहे हे उघड आहे.

     या नरक राज्याला कृष्णाने मारले,अशा अर्थाच्या ज्या कथा आढळतात,त्या इतर अनेक कथांप्रमाणे कृष्णाच्या नावावर नंतर घुसडण्यात आल्या आहेत.नरक राजा आपले सामर्थ आणि सद्गुण यांच्या जोरावर आपले इंद्रपद हिरावून घेईल,अशी भिती इंद्राला वाटत होती,याचा अर्थ वैर होते,ते वैदिक इंद्र आणि नरक राजा यांच्यामध्ये.परंतु इतिहास तशा पद्धतीने लिहिण्याऐवजी बहुजननायक असलेल्या कृष्णाने नरक राज्याची हत्या केली,असे खोटेच लिहिण्यात आले,हे उघड आहे.कृष्णाची लोकप्रियता वापरून बहुजन समाजामध्ये बहुजनांचा नायक असलेल्या नरक राजाविषयी तिरस्कार निर्माण करण्याच्या हेतूने कृष्णाच्या नावाचा वापर करण्यात आला.नरक राजाप्रमाणेच स्वत: कृष्ण इंद्रविरोधक होता,हे ध्यानात घेतले असता,कृष्ण इंद्रासाठी नरक राजाची हत्त्या करणे शक्य नव्हते.स्वाभाविकच नरक राजा आणि कृष्ण यांच्यातील वैर आणि युद्ध ही एक काल्पनिक गोष्ट ठरते.नरक राजा एक वेगळी संस्कृती चालवत असल्यामुळे त्याची बदनामी करण्यासाठी 'नरक' या शब्दाचा अर्थ 'मृत्यूनंतर यातना भोगण्याचे स्थान' असा करण्यात आला आणि तो शब्द भाषेमध्ये रूढ करण्यात आला.

     नरक राजाचा पराभव वा अंत या दिवशी झाला होता,असे म्हणण्याला वस्तुनिष्ठ असा सबळ पुरावा नाही.तो इंद्रावरील त्याच्या विजयाचा दिवस होता.ज्या अर्थी त्या दिवसाला त्याचे नाव देण्यात आले आहे,त्या अर्थी तो दिवस त्याच्या गौरवाचा,महात्म्याचा आणि जयजयकाराचाच आहे,हे उघड आहे.त्या दिवशी कृष्णाने त्याला मारले असते,तर तो दिवस कृष्णाच्या जयजयकाराचा झाला असता आणि त्या दिवसाला नरकाचे नाव देण्याऐवजी कृष्णाचे दिले गेले असते किंवा इंद्राचे दिले गेले असते.या घटनेशी कृष्णाचा सबंध नाही हे तर उघडच आहे.

     नरकचतुर्दशीच्या दिवशी नरक राजाची आठवण जागवणे,त्याला आदरांजली अर्पण करणे आणि त्याच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करणे,यासाठी दिप प्रज्वलित केले जातात.असा उत्सव साजरा करण्यामागे एक खास धारणा असते.एक वर्षापूर्वी त्या व्यक्तीचे स्मरण करून तिच्याकडून जी प्रेरणा घेतलेली असते,ती वर्षभरामध्ये काळाचा परिणाम म्हणून काहिशी क्षीण झालेली असते,म्हणून एक वर्षानंतर पुन्हा त्या प्रेरणेचे नुतनीकरण करणे आणि ती ताजेपणाने आपल्या अंतर्यामी धारण करून पुढच्या वर्षासाठी नव्याने उर्जा संकलित करणे,असा याचा अर्थ असतो.नरक चतुर्दशीच्या निमित्ताने नरक राजाच्या चरित्रातून अशी प्रेरणा घेणे,हे उचित होय.एक प्रकारे त्या दिवशी नरक राजाचे आपल्या जीवनात पुनरागमन होते,म्हणून त्याचे स्वागत करण्याचा दिवस या दृष्टीनेही आपण या दिवसाकडे पाहू शकतो.

     आश्विन अमावास्येला लक्ष्मीपुजन केले जाते.लक्ष्मी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.या संदर्भात धनसंपदा,वैभव,समृद्धी हा या शब्दाचा अर्थ आहे.धनत्रयोदशीच्या संदर्भात धनाविषयी जे म्हटले,तेच लक्ष्मीपुजनालाही लागू पडते.यामध्ये आणखी काही गोष्टींची भर घालणेही आवश्यक आहे.

     लक्ष्मीपुजन हे मुळचे 'निर्ऋतिपूजन' होते.निऋती ही सिंधु संस्कृतीच्या काळातील एक अतिशय महान स्त्री होती.आज लक्ष्मी ज्या समृद्धीचे प्रतिक मानली जाते,त्या समृद्धीची खर्या अर्थाने निर्मिती करण्याचे महान कार्य प्राचीन काळात बहुजन समाजातील अतिशय श्रेष्ठ अशा निर्ऋती नावाच्या स्त्रीने केले होते.यज्ञयागासारख्या चाकोरीबद्ध कर्मकांडाचा अंगीकार करण्याऐवजी तिने समाजरचनेत सर्व प्रकारच्या नवनिर्मितीच्या संकल्पना कार्यान्वित करण्याचे कार्य केले होते.नवनिर्मितीच्या या कार्यामुळेच तिची पृथ्वीबरोबर तुलना केली जात असे.स्वाभाविकच,'निर्ऋति' या शब्दाचे 'आनंद देणारी', 'पृथ्वी', असेही अर्थ झाले होते.या निर्ऋतीचा बहुजनांची महान पूर्वज जी पार्वती तिच्याशीही निकटचा संबंध होता.नवनिर्मिति,समृद्धी,उज्ज्वल यश आणि आनंद यांचे प्रतीक असलेली ती बहुजनांच्या जीवनाला विधायक दिशा देणारी आहे.भारतीयांच्या आद्यमातांपैकी ती एक आहे.

     निर्ऋतीचे आपल्या सांस्कृतिक जीवनातील हे अतिशय उदात्त स्थान पाहता आपण या दिवशी निर्ऋतीच्या गौरवाचा उत्सव साजरा करावा.

     या दिवशी केरकचरा काढण्याचे साधन असलेल्या केरसुनीची पुजा केली जाते.ही पुजा करताना तिलाच लक्ष्मी मानले जाते.या प्रथेचा अर्थ आपण काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.केरसूणी स्वच्छता निर्माण करते.जेथे स्वच्छता असते,तेथे आरोग्य,प्रसन्नता,मन:शांती,सौदर्य, आणि खरीखुरी समृद्धीही येते.हा स्वच्छतेचे महत्व मनावर बिंबविण्याचा संस्कार आहे.पण त्याबरोबरच आपल्याला स्वच्छता देणार्या एका निर्जीव साधनाचीही कृतज्ञतापूर्वक पूजा करणे,ही कृती आपल्याला एक फार महत्वाचा संदेश देणारी आहे.श्रमाचा द्वेष करता कामा नये.श्रमातून,कष्टातून मानवी जीवन स्वच्छ आणि सुखी होते.आता, निर्जीव साधनाचीही अशी पुजा करायची असेल,तर सर्व प्रकारच्या श्रमजीवी लोकांविषयी आणि त्यातही समाजातील ज्या व्यक्ती इतरांना स्वच्छ आणि प्रसन्न जीवन लाभावे म्हणून अस्वच्छता दूर करण्याचे श्रम करतात,त्यांच्याविषयी आत्मीयता आणि कृतज्ञता बाळगणे,हा अतिशय उदात्त संदेश या प्रथेतून घेता येतो.

     आश्विन अमावास्येलाच भारताचे एक अतिशय महान सुपुत्र तीर्थंकर वर्धमान महावीर यांना निर्वाण प्राप्त झाले.त्यांचा उपदेश मानव जातीसाठी हितकारक आणि कल्याणकारक आहे.प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक असते आणि वर्धमान महावीरांनी जो ज्ञानाचा आणि मानवी मूल्यांचा उपदेश केला,तो सदैव प्रकाशमय राहणार आहे.त्यांचा हा उपदेश सर्व लोकांपर्यंत पोचावा आणि तो पोचविण्यासाठी आपलाही हातभार लागावा,ही भावना या दिवशी आपल्या मनात उत्कट स्वरूपात जपता येते.

     जैन परंपरेमध्ये महावीरांच्या निर्वाणाचा निर्देश 'निर्वाणकल्याणक" या शब्दाने केला जातो. त्यांचा जन्म,त्यांची ज्ञानप्राप्ति इ.घटना जशा लोकांचे,प्राणीमात्रांचे कल्याण साधणार्या मानल्या जातात,तसेच त्यांचे निर्वाणही कल्याणकारक मानले जाते आणि म्हणूनच त्याचा निर्देश 'निर्वाणकल्याणक'  या शब्दाने केला जातो.

     निर्वाणकल्याणकाची संकल्पना आपल्याला जीनव आणि मृत्यू यांच्याविषयी एक आगळा आणि प्रसन्न दृष्टीकोण देणारी आहे.अनेकांतवादाच्या दृष्टीनेच पहायचे,तर जैन परंपरेत ज्याला एका दृष्टीने निर्वाण म्हटले जाते,तो दुसर्या दृष्टीने देहाचा अंत असतो,मृत्यू असतो.पण परिपूर्ण जीवन जगून झाल्यानंतरच्या मृत्युकडे विघातक म्हणून न पाहता,त्याला विनाशक न मानता,त्याला कल्याणक मानणे हे मृत्यूलाही अवीट सौदर्य देणेे आहे.म्हणूनच महावीरांच्या निर्वानानंतर लोकांनी दिपोत्सव साजरा केला आहे.या दिपोत्सवाची अनेक वर्णने आढळतात.नमुना म्हणून इथे काही वर्णनांचे स्वरूप पाहू या. जैन परंपरेतील 'हरिवंशपुराण' या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन पुढीलप्रमाणे केल्याचे उल्लेख आढळतात :

 ज्वलत्प्रदीपालिकया प्रवृद्धया सुरासुरै: दीपितया प्रदीप्तया।
 तदा स्म पावानगरी समन्तत: प्रदीपिताकाशतला प्रकाशते।।
    हरिवंशपुराण ६६।१९।।

     अर्थ : त्या वेळी (महावीरांचे निर्वाण झाले,त्या वेळी) सुर आणि असूर यांनी प्रदीपांच्या (मोठमोठ्या दिव्यांच्या) मालिका प्रज्वलित केल्या.त्या खुप मोठ्या झाल्या,त्या दिपित झाल्या (झळाळू लागल्या) प्रदीप्त झाल्या (अतिशय प्रकाशित झाल्या).त्यामुळे,जिच्यावरचे आकाश सर्व बाजूंनी प्रदीपित झाले होते,अशा पावानगरीत सर्व आसमंत प्रकाशित झाला.

     जैन साहित्यात महावीरांच्या निर्वाणाचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आल्याचे आढळते,".....घरोघर दीप पाजळले गेले.रस्तोरस्ती दीप तेजाळले गेले.जिकडे तिकडे दीपच दीप दिसू लागले.दीपांची रांगच रांग प्रकाशू लागली.दीपांच्या पंक्ति जागोजागी चमकू लागल्या.ते पाहून लोक नाचू लागले.भक्त गाऊ लागले.'नम: श्री वर्धमानाय' चा जयघोष दाही दिशांतून घुमू लागला.या अविस्मरणीय आनंदाला नाव देण्यात आले 'दीपावली'.त्या दिवसाला नाव मिळालं 'दिवाळी', आनंदाची दिवाळी,ज्ञानाची दिवाळी,मोक्षसुखाची दिवाळी,भ.महावीरांच्या निर्वाणाची दिवाळी.अमावस्या असून देखील त्या वेळी जगभर पसरलेल्या उद्द्योताचे प्रतीक-स्मृतिचिन्ह म्हणून आजतागायत सामान्य जनता या दिवशी दिव्याच्या ज्योती उजाळून हा आगळा आनंदमहोत्सवी सण अखंड साजरा करीत आली आहे.अखंड साजरा करीत राहणार आहे."

     मृत्यूकडे पाहण्याची ही दृष्टी अतिशय सुखद आहे.एका दृष्टीने हे महावीरांनी उपदेशिलेल्या अनेकान्तवादाचे मधुर फळ  आहे. मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून ती जीवनाची परिपूर्णता आहे,परिपक्वता आहे.खरे तर मृत्यू हिच मृत्यूवरची मात आहे,मृत्यूचा पराभव आहे,मृत्यूच्या पलिकडे जाणे आहे.म्हणून हा क्षण दु:खाचा नसून आनंदाचा आहे.बाहेर अमावस्येचा अंधार पसरल्यासारखे दिसत असले,तरी ती प्रत्यक्षात निर्वाणाच्या प्रकाशाची पौर्णिमा आहे. तो मानवी अस्तित्वाचा परमोच्च बिंदू आहे, विकासाची सर्वोच्च अवस्था आहे,आनंदाची परम सीमा आहे!

     ....दिवाळीचे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारे आहे.

     विजयादशमी आणि बलिप्रतिपदा या दोन्ही दिवशी बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून आपल्यासाठी उमदी प्रेरणा घेण्याचे विधायक,भावात्मक आणि आपल्या सर्जनशिलतेची अभिव्यक्ति करणारे उपक्रम आयोजित करावेत.या काळात आपली मने बळीराजाच्या आणि बळीराजासारख्या आपल्या प्रेरणास्थानांच्या विचारांनीच भरलेली आणि भारावलेली असावीत.आपल्या मनामध्ये अशावेळी नको त्या व्यक्तींच्या थोड्याशा स्मरणालाही वाव असू नये.आपली मने प्रसन्न राहावीत,यासाठी हे आवश्यक आहे.म्हणून या काळात कोणाच्या प्रतिमांचे दहन करणे वगैरेंसारखे नकारात्मक उपक्रम अजिबात करू नयेत.

     .....'भाऊबीज' हा अनेक दिवस चालणार्या दिवाळीच्या सणातील प्रत्यक्ष रित्या शेवटचा दिवस होय.भाऊ आणि बहिण यांच्यातील रक्ताच्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याचे नूतनीकरण आणि दृढीकरण असे त्याचे स्वरूप आहे.बीज म्हणजे द्वितीया.कार्तिक शुक्ल द्वितीयेला हा सण साजरा केला जात असल्यामुळे त्याला 'भाऊबीज' असे नाव देण्यात आले आहे.आपल्या सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये मुलीला आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर लग्न करून माहेरातून सासरी जावे लागते.हे स्थित्यंतर अटळ आहे.मुलगी सासरी गेल्यानंतर तिचे जीवन अनेक दृष्टींनी बदलते आणि ती क्रमशः सासरच्या जीवनाशी एकरूप होऊन जाते.असे असले, तरी जिथे जन्म झाला आणि जिथे लग्नापूर्वीचे सगळे आयुष्य व्यतीत झाले,त्या स्थानाबरोबरचे आणि तिथल्या व्यक्तींबरोबरचे सगळे नाते कधीच तुटत नाही.ती सासरी पूर्णपणे सुखी समाधानी असली,तरी देखील माहेरबरोबरच्या नात्याची जपणूक करण्यामध्ये  तिला एक विलक्षण आनंद मिळत असतो.सासरी ती अडचणीत वा दु:खात असली,तरी तिला माहेरच्या ममतेची गरज असते.दुसर्या बाजूने भावाला आपले घर सोडून अशाप्रकारचे स्थित्यंतर करावे लागत नसले,तरी देखील आपल्या कुटूंबाचा आणि भावविश्वाचा एक अतिशय निकटचा भाग असलेली बहिण आपले घर सोडून दुसरीकडे गेल्यानंतर त्यालाही आपल्या जीवनाच्या परिपूर्णतेसाठी बहिणीविषयीचा जिव्हाळा जपण्याची भावनिक गरज वाटतच असते.आशा रितीने वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या संसारात स्थिरावल्यानंतरही भाऊ आणि बहिण यांना आपले नाते जपण्याची उत्कट इच्छा असते.लग्नापूर्वीही ते जपलेले असते आणि लग्नानंतरही ते जपण्याचा क्रम चालू ठेवण्याची आवश्यकता त्याना जाणवत असते.जिव्हाळ्याची ही जपणूक व्यक्त करण्याचे एक ह्रद्य प्रतिक म्हणजे भाऊबीज हा सण होय.या प्रकारच्या भावणेतून हा सण साजरा करून भाऊ आणि बहिण यांच्या नात्याला दृढता देणे हे योग्य आहे.

     दिवाळीचा सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही,याची काळजी घ्यावी.पैशाची उधळपट्टी,संपत्तीचे अनुचित प्रदर्शन,कर्ज काढून सण साजरा करणे इ.अनिष्ट प्रकारही टाळावेत.

सौजन्य - शिवधर्म गाथा
संकलन - रामचंद्र सालेकर

।। जय जिजाऊ ।।