ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन
दिघोरी / मोठी - भारताच्या संविधानामुळेच देश मजबूत आहे. धर्माच्या नावावर तयार झालेला देश नेस्तनाबूत झालेत. संविधान हाच आपला धर्मग्रंथ असून संविधान समजून आणि जाणून घ्या, असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी केले. ओबीसी सेवा संघाच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. ओबीसी विविध श्रद्धास्थाने मानित असला तरी आपल्या घटनात्मक अधिकारासाठी एक व्हायला पाहिजे. संख्येच्या प्रमाणात नोकरी व इतर क्षेत्रात प्रतिनिधित्व मिळाले नाही. म्हणून ओबीसीची जातिनिहाय जणांना आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
महिलांनी सत्यशोधक बनावे असे, आवाहन प्रा. माधुरी गायधनी यांनी केले. अॅड. रमेश राठोड म्हणाले, ओबीसींनो धर्मभोळे बनू नका, आपल्या अधिकारासाठी एकत्र येऊन लढा मजबूत करा.
तिघांचा सत्कार
याप्रसंगी समाजरत्न सन्मान देऊन शिल्पा खंडाईत व संजीव बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. दिघोरी येथील सर्वसाधारण कुटुंबातील वैभव तुळशीदास चकोटे यांनी आयआयटी खडकपूर येथे प्रवेश मिळविल्याबद्दल संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना शिल्पा खंडाईत म्हणाल्या, समाजात मागे ओढणारे लोक बरेच असतात आपण सत्याचा मार्ग धरून पुढे जाण्याचा दृढनिश्चय करावा. समाजात आणखी जोमाने कार्य करण्यासाठी हा सन्मान मला प्रेरणादायी ठरेल असे विचार संजीव बोरकर यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी ठाणेदार हेमंत पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्षा सरपंच सुनिता साळवे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. संचालन दीपक कांबळे यांनी केले. आभार मिलिंद करंजेकर यांनी मानले. कार्यक्रमाला भैय्याजी लांबट, मंगला वाडीभस्मे, सदानंद ईलमे, गोपाल सेलोकर, जिप सदस्य अविनाश ब्राम्हणकर, लाखांदूर पंस सभापती संजना वरकडे सभापती, गुलाब कापसे, प्रा. अनिल कानेकर, केशव डोंगरे, व्यंकट मेश्राम, दीपक चिमणकर, अनिता बोरकर, ललिता देशमुख, जयंत झोळे, ईश्वर निकुळे, वामन गोंधुळे, मनोहर टिचकुले, रमेश शहारे, प्रभाकर वैरागडे, अरविंद रामटेके उपस्थित होते.