लढा देण्याचे डॉ. आढाव यांचे आवाहन
'इंग्रजां च्या गुलामगिरीपेक्षाही घातक संकट चातुर्वर्ण्य आणि धर्मसत्तेच्या रूपाने देशावर चालून येत आहे. त्याचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन लढा दिला पाहिजे,' आवाहन कष्टकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी बुधवारी व्यक्त केले.
'उपराकार' लक्ष्मण माने यांच्या 'किटाळ' या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आढाव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, निखिल वागळे, अॅड. जयदेव गायकवाड, मेहता प्रकाशनचे अखिल मेहता आदी या वेळी उपस्थित होते.
'शहानिशा न करता मानेंवर आरोप करणे, ही अनेक महिला संघटनांचीही चूक होती. भ्रष्टाचार आणि बाकीचे आरोप करू शकत नाहीत म्हणून चारित्र्यहननाचा माध्यम म्हणून वापर केला जातो. बलात्काराचा आरोप होऊन समाजाच्या नजरा झेलत जगणे भयावह आहे,' असे मत वागळे यांनी व्यक्त केले. 'पद्मश्री मिळाल्यानंतर मला पुन्हा अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. हा अतिशय वाईट काळ होता,' अशी खंत माने यांनी व्यक्त केली. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.
लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचे खोटे आरोप करून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान साताऱ्यातील राजघराण्यातील एका व्यक्तीचे होते. ती व्यक्ती आज राज्याच्या विधीमंडळात वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. - निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार
""काल न लावता केवळ सरकार विनाचौकशी, आरोपांवरून वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवत आहे. आताचे सरकार अशा हत्यारांचा वापर करत आहे. - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते