ओबीसी अस्मिता रथ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

12 दिवसात 2 हजार 550 किमीच्या प्रवासात 169 गावांना भेट
जनगणनेत ओबीसी चा स्वतंत्र रकाना नसल्यामुळे ओबीसींनी जनगणेवर बहिष्कार टाकावा : सचिन राजुरकर

     भद्रावती - ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात ओबीसी अस्मीता रथ यात्रा काढण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात अस्मिता रथयात्रेने १२ दिवसात १६९ गावांना भेटी देत २ हजार ५५० किलोमीटरचा प्रवास पार केला.

Spontaneous_response_to_OBC_Asmita_Rath_Yatra     ५१ गावात सभा घेण्यात आल्या असून ७ गावात रॅली काढून ओबीसी बांधवांमध्ये ओबीसी जनगणनेबाबत जनजागृती करण्यात आली.
ओबीसी जनगणना अस्मिता रथ यात्रेची सुरुवात २ मार्च २०२० ला चंद्रपूर च्या जनता महाविद्यालय चौकातून प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रथयात्रेला सुरुवात केली. सदर रथयात्रा संपूर्ण जिल्हाभर जनजागृती करण्याकरिता निघाली. सर्वप्रथम रथयात्रा बल्लारपुर, पोंभुर्णा, मुल, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, जिवती, भद्रावती, वरोरा, सिंदेवाही, सावली, नागभिड, ब्रम्हपुरी या तालुक्यातील गावांना भेटी देवून जगजागृती सभा घेण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सचिन राजूरकर म्हणाले की, संपूर्ण ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, जनगणना झाली तरच ओबीसी प्रवर्गातील जातीचा विकास होईल, अन्यथा ओबीसी प्रवर्गातील जातीवर फार मोठा अन्याय होईल. त्यामुळे १ में २०२० पासून सुरु होणाऱ्या जनगणनेत जनगणना करण्यास स्पष्टपणे नकार देऊन कोणतीही माहिती देऊ नये, यावेळी आपण सर्व ओबीसी प्रवर्गात मोडण्यात जातीने एकसंघ होऊन बहिष्कार टाकावा असे आवाहन त्यांनी केले.

    या ओबीसी अस्मीता रथयात्रेला बबन फंड, शाम लेडे, रामराव हरडे, रमेश ताजने, गणेश आवारी, गिल्लोरकर, अंकुश कौरासे, येरगुडे, बोबडे, गणपती मोरे, सुर्यकांत साळवे, राजू हिंवज, आगलावे सर, भोयर सर, पवन राजुरकर, रवी शेंडे, बादल बेले, सतोश देरकर, उकुडे, समीर रासेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कर्मचारी-अधिकारी पद्धधिकारी, महिला महासंघाचे पदाधिकारी, विध्यार्थी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

१८ मे ला जंतरमंतर मैदानावर धरणे आंदोलन

    १८ मे २०२० रोजी न्यू दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर ओबीसी प्रवर्गाची जनगणना करण्यात यावी. या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात ओबीसी जनतेने फार मोठया संख्येत सहभागी व्हावे. असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या • वतीने करण्यात आलेले आहे.