महागाव शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात लागू करावी, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसी जनगणना जातनिहाय करावी, ओबीसी मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजाशी संलग्न विविध मंडळाची कर्ज माफ करून न्यायालयात दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यात याव्या, आदी मागण्या करण्यात आल्या. यासह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा वापर बंद करावा, या सर्व मागण्या केंद्र सरकार तथा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून उचित कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास शहर काँग्रेस ओबीसी विभागा मार्फत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शैलेश कोपरकर, ओबीसी विभाग अध्यक्ष मनोज केदार, महेन्द्र कावळे, मेहबूब पठाण, सुनील भरवाडे, दीपक गावंडे, जयश्री इंगोले, संतोष कोल्हेकर, अंकुश कावळे, महेंद्र कावळे, श्रीकांत लिगदे, राजू आगासे आदी उपस्थित होते.