प्रदीप ढोबळे - 9820350758, BE MBA BA LL.B.
आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. खरंतर भक्ती करण्यात काहीच वाईट नाही. तरीही आज हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला कारण की भक्तीमुळे देशाचा काही नुकसान होतं की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. खरं पाहिलं तर भक्ती हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मामला आहे..आपल्याला माहित आहे की मीरानी कृष्णाची भक्ती केली; तिने अनेक भक्ती रसाची काव्य निर्मिती केली; ती काव्य निर्मिती अजरामर सुद्धा झाली. तो साहित्याचा एक प्रकार आहे आणि अशा प्रकारच्या भक्तीचे समर्थनच मी करणार. मीरानी कृष्णावर अतोनात प्रेम केले; ती कृष्णमंय होऊन अजरामर झाली. भक्तीचा अर्थ असा की आपण एखाद्या व्यक्तीशी एकमय होऊन जाणे . तो व्यक्ती आपलं सर्वस्व आहे असे मानने. तो व्यक्ती ठरवेल तशाप्रकारे मार्गक्रमण करणे.एका अर्थाने आपले स्वामित्व त्या व्यक्तीस बहाल करणे होय आणि दुसऱ्या अर्थाने पूर्णपणे त्या व्यक्तीचे गुलाम होणे असे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आध्यात्मिक क्षेत्रात भक्ती हा मोक्षाचा मार्ग असू शकतो परंतु राजकीय क्षेत्रात तो आम्हाला पूर्णता गुलामीकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे आणि आम्ही आमची मालकी ज्या व्यक्तीवर सोपवतो तो व्यक्ती हुकूम शहा बनण्याची दाट संभावना आहे.
आपण भक्त झाला आहात का याची चाचणी आपण स्वतः करून घ्यावी.
प्रश्न एक: काय आपणास सदा सर्वकाळ एखादा नेता खूप आवडतो.
प्रश्न दोन : काय त्या नेत्याच्या प्रत्येक निर्णयाशी व शब्दाशी तुम्ही शंभर टक्के सहमत असतात.
प्रश्न तीन: आपल्या एखाद्या मित्राने त्या नेत्याच्या विरुद्ध बोलल्यास आपणास त्या मित्राचा राग येतो..
वरील तिन्ही प्रश्नाची उत्तरे होय असेल तर समजा की आपण भक्त झालेले आहात आणि आपल्याला एक मानसिक व्याधी जडलेली आहे.
प्रश्न क्रमांक एक नुसार एखादाच नेता सदा सर्वकाळ आयुष्यभर आपला नेता कसा असू शकतो. काय आपल्या जीवनामधील विविधता आणि भिन्नता खतम झाली आहे का ? विविधता आणि भिन्नता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
प्रश्न क्रमांक दोन नुसार आपण मनुष्य असल्यामुळे आपल्याकडून थोडी बहुत चूक होणारच आणि स्वाभाविकता नेता हा सुद्धा मनुष्य असतो आणि त्याच्या हातून पण थोडीफार चूक होऊ शकते तरी आपण त्याच्याशी १००% सहमत आहात याचा अर्थ आपण आपली सद्विवेक बुद्धी नष्ट केलेली आहे.
प्रश्न तीन नुसार जर का आपल्याला आपल्या मित्राचा राग येत असेल तर लोकशाही मध्ये प्रत्येक व्यक्तीचा मग तो कितीही मोठ्या पदावर असो त्याच्यावर आलोचना करण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक व्यक्तीपाशी आहे; नव्हे तो लोकशाहीचा प्राणच आहे; याचाही विसर आपल्याला पडलेला आहे आणि तद्वय आपणच लोकशाहीचे मारेकरी ठरत आहत असे आपले जगणे आहे. लोकशाहीचे मारक जर का देशातील जास्तीत जास्त जनता झाली तर देशात हुकूम शहा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. ब्रिटिशांची राजवट ही एक प्रकारची हुकूमशाहीच होते. हुकूमशाही माणसाच्या मुक्त विचार करण्यास व मुक्त संचार करण्यास बंधन घालते आणि त्यामुळे मनुष्याचा विकास होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या राजवटी विरुद्ध स्वातंत्र्य सेनानी नी आंदोलने केली; स्वतः फासावर हसत हसत चढवून घेतले. भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या हा त्याग म्हणजे राष्ट्रवाद. परंतु या राष्ट्रवादाचे मूळ कारण मनुष्याचा सर्वांगीण विकास हेच आहे आणि सर्वांगीण विकास तेव्हाच होऊ शकतो तेव्हा मनुष्यास मुक्त संचार आणि मुक्त विचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येईल... राष्ट्रवादाच्या या परिभाषेस अतिशय सीमित करण्याचे काम सध्या आपल्या देशात आपण बघतो आहे. तुम्ही अमुक अमुक विचाराचे असले पाहिजे; तुम्ही अमुक तमुक नेता मानला पाहिजे; तुम्ही अमुक अमुक नारा दिला पाहिजे; तरच तुम्ही राष्ट्रवादी; अशी राष्ट्रवादा ची गलिच्छ परिभाषा आज देशात आकार घेत आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्याचा जो मूळ अर्थ म्हणजेच मनुष्याचा सर्वांगीण विकास त्यालाच छेद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आध्यात्मिक क्षेत्रात आपण एखाद्या देवाचे भक्त असल्यास तो संपूर्णपणे तुमच्या मुक्त स्वातंत्र्याचाच भाग आहे परंतु राजकीय क्षेत्रात आपण एखाद्या नेत्याचे भक्त असणे म्हणजे देशातील लोकशाही नष्ट करून हुकूमशाहीचा मार्ग निर्माण करण्यासारखेच होईल.
आध्यात्मिक क्षेत्रातही जी व्यक्ती दिवंगत झाली आहे; त्याचे पूर्ण आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी गेलेले आहेत असे सिद्ध झालेले आहे त्याची भक्ती करण्यात काहीच वावगे नाही. परंतु जी व्यक्ती जीवित आहे आणि अध्यात्मिक क्षेत्र घेण्यामागे त्या व्यक्तीचा काय उद्देश आहे; या पर्यंत आपण पोहोचत नसाल तर अशी भक्ती सुद्धा धोकादायक असू शकते. आसाराम व राम रहीम या दोन अध्यात्मिक नेत्याबाबत काय घडले हे सर्वांना माहित आहे. आसाराम या व्यक्तीस तर जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. अंधपणे आसाराम वर भक्ती करणाऱ्या एका भक्ताच्याच मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्याखाली आसारामला जन्मठेप देण्यात आली आहे हे आपण विसरता कामा नये. आसाराम बापूस जन्मठेपे च्या शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी न्यायालयात शेवटपर्यंत लढाई करणारा; हा ही त्याचाच भक्त होता हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.परंतु जेव्हा त्याचे डोळे उघडले तोपर्यंत फार मोठा अनर्थ झाला होता. वेळीच तो सावध झाला असता तर त्याच्या मुलीस तो लैंगिक शोषणापासून वाचवू शकला असता. निसर्गाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे; सारासार विचार करण्याची क्षमता दिलेली आहे.. या बुद्धीचा आणि क्षमतेचा आपण जर का वापर केला तर जिवंत राजकीय नेते किंवा आध्यात्मिक नेते सुद्धा आपला गैर उपयोग करू शकणार नाही. एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदास विचारले की आपण नेहमी आत्मविश्वास आत्म विश्वास म्हणतात तो नेमका काय? त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की स्वतःवरचा शंभर टक्के विश्वास म्हणजे आत्मविश्वास. ज्या प्रमाणात आंधळेपणाने आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू लागतो त्याच प्रमाणात आपला आत्मविश्वास सुद्धा कमी झालेला असतो... आत्मविश्वास फार मोठ्या प्रमाणात कमी झाला तर त्यातून आत्मग्लानिचा जन्म होतो.. आणि आत्मग्लानि मुळे बरीचशी मंडळी आत्महत्या सुद्धा करतात.. त्यामुळे आपण घेतलेल्या शिक्षणामुळे व आपण स्वतः घेतलेल्या अनुभवामुळे जो विश्वास निर्माण होतो त्या आत्मविश्वासाला वापरण्याची आज गरज आहे. जिवंत व्यक्तीचे वाटत असल्यास अनुयायी बना पण भक्त नको.
जय भारत जय संविधान