निळे, हिरवे, पिवळे, भगवे झेंडे घेऊन महिलाही सहभागी
सोलापूर - 'संविधान वाचवा'चा नारा देत भारत मुक्ती मोर्चाने सोमवारी बहुजन क्रांती मोर्चा काढला. डॉ. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तिथे देशातील सद्यस्थितीवर करणारी भाष्य करणारी भाषणे झाली. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते.
संघाचा अजेंडा राबवणाऱ्या भाजपने घटनेची मोडतोड करण्यास सुरुवात केली. मागास घटकांच्या आरक्षणावर गदा आणण्याचे षड्यंत्र रचले. आदिवासी, ओबीसी यांना मिळालेले घटनादत्त अधिकार काढून टाकण्यास सुरुवात केली. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयावर मोर्चे होते. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिला, विद्यार्थिनी, चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या खांद्यावर भगवे, हिरवे, निळे आणि पिवळे झेंडे होते.
कर्मवीर भाऊराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मे आणि महामानव डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चा पूनम गेटवर गेला. या वेळी रणजित सोनवणे, काकासाहेब जाधव, सौरभ वाघमारे, अशोक गायकवाड, सविता मस्के, धनश्री शिदगणे, कलावती कांबळे, अभिषेक शिंदे, कीर्तिपाल गायकवाड, शिल्पा शिंदे, कृष्णा साबळे, खिजर पीरजादे, फिरोज शेख आदी उपस्थित होते.