ओबीसीच नव्हे, सर्वांची जातनिहाय जनगणना करा

शेगावातील संमेलनात प्रा. संदेश चव्हाण यांचे आवाहन

     बुलढाणा - केवळ ओबीसीच नव्हे तर सर्वांची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. याशिवाय समाजांचा विकास अशक्य आहे, ही बाब सर्वच पक्षातील राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी केले.

Do_a_caste-wise_census_of_all_not_just_OBC      ओबीसी - व्हीजेएनटी-एसबीसी समन्वय समितीच्यावतीने विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेगावात संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना प्रा. चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष प्रा. रमेश पिसे, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, ओबीसी जनमोर्चाचे विलास काळे, नितेश कराळे, ओबीसी सेवा संघचे गोपाल सेलोकर, शिव ब्रिगेड संघटनेचे सतीश मालेकर, ओबीसी जनगणना परिषदेचे प्रा. उमेश सिंगनजुडे आदी उपस्थित होते. प्रा. चव्हाण म्हणाले, आज ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसींची परिस्थिती दयनीय झाली आहे. आपण सगळे एकच आहोत, हे समजले पाहिजे. राजकीय नेते आपल्याला भावनिक आवाहन करून सत्तेत पोहचतात, ते आपले नाहीत हे मान्य करावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रा. पिसे म्हणाले, १२५-१३० खासदार संसदेत असूनही आमचे हक्क, अधिकार मिळत नाहीत, हे दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रास्ताविक ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोरारम तर संचालन गोपाल देशमुख यांनी केले.

चर्चेतील मुद्द
■ ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
■ शंभर टक्के शिष्यवृत्ती सर्वच अभ्यासक्रमात मिळायला हवी.
■ वसतिगृह त्वरित सुरू करण्यात यावे.
■ आर्थिक विकास महामंडळावर संचालक नेमावे.
■ महाज्योती संस्थेला लोकाभिमुख करण्यात यावे.