सत्यशोधक समाज संघाच्या दुसऱ्या जिल्हा अधिवेशनात जी. ए. उगलेंचे मत
जळगाव मानवाला माणुसकी प्रदान करणारी एकमेव चळवळ म्हणजे महात्मा फुले यांची सत्यशोधक समाज चळवळ, असे प्रतिपादन सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक जी. ए. उगले (पैठण) यांनी केले.
कुर्हे पानाचे (ता. भुसावळ) येथे ११ डिसेंबर २०२२ रोजी सत्यशोधकी समाज संघाचे दुसरे जिल्हा अधिवेशन उत्साहात झाले. त्याप्रसंगी जळगाव जिल्हा आणि सत्यशोधकी चळवळ या विषयानुषंगे प्रमुख सत्यशोधकी वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना उगले बोलत होते. अधिवेशनाचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांनी मशाल पेटवून केले. त्यानंतर तळी उचलण्याचा विधी झाला.
खान्देशात केली चळवळ उभी
जी. ए. उगले यांनी खानदेशातील सत्यशोधक चळवळीचा जाज्वल्य इतिहास सांगताना १९१४ मध्ये वेरूळ बेळशेंद्रे (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील सत्यशोधक राजे हेमसिंग भोसले यांनी खान्देशात चळवळ उभी केली. भोसले यांच्या योगदानातून जळगाव जिल्ह्यात तब्बल २२ गावांत शाखा स्थापन झाल्या. १९२९ मध्ये हिंगोणा येथील नीळकंठराव श्रीपतराव पाटील यांनी आत्मोद्धार साप्ताहिक चालवले आणि त्या काळात ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण ११ सत्यशोधकी सभासद निवडणुकीत निवडून महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती इतिहास घडविला. परिणामी जबरदस्त व तगडा कार्यकर्ता म्हणून त्यांनी नीळकंठरावांचा उल्लेख केला. ५ व ६ मे १९१७ रोजी आडगाव (ता. एरंडोल) येथे सत्यशोधक समाजाचे सातवे अधिवेशन मुकुंद दाजिबा पाटील यांच्या मळ्यात सत्यशोधकी ज्ञानगिरी बाबांच्या अध्यक्षतेखाली झाले. आडगावकर काशिराम देवाजी पाटील आणि जलसाकार चिंधू कृष्णा वाघ यांच्या परिश्रमातून अधिवेशन ऐतिहासिक झाल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा. पक्का सिद्धांत ऐकायचा असेल तर सत्यशोधक समाजात या, असे आवाहन उगले यांनी उपस्थितांना केले. उद्घाटनपर मार्गदर्शनात आमदार चौधरी म्हणाले की, संघटनेचे अस्तित्व टिकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मूलभूत हक्क व अधिकार मिळविण्यासाठी लढ्याला सातत्याने धार दिली पाहिजे. संमेलनाचे कार्याध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी प्रास्ताविक केले.