नागपूर - ओबीसी आरक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांठिया आयोग नेमून इम्पेरिकल डेटा गोळा केला. सर्वोच्च न्यायालयात सादर करतानाच ट्रीपल टेस्टची पूर्तता केली, त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. हा निर्णय येताच ओबीसी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे यांच्या नेतृत्त्वात मिठाई वाटून व फटाके फोडून आंदोत्सव साजरा करण्यात आला. तर, सत्तांतर होताच राज्यातील शिंदे भाजप सरकार आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नव्या सरकारच हे यश असल्याचे सांगत भाजपनहीं गुरूवारला जल्लोष करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हेरायटी चौकात आयोजीत विजयोत्सवावेळी राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर वाळबुधे यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच आरक्षणासाठी दिल्लीत लढा देणारे तत्कालीन मंत्री तथा ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, समीर भुजबळ, लढाईसाठी वकिलांची फौज उभी करण्यासाठी धडपडणारे प्रफुल्ल पटेल याचे आभार व्यक्त केले.