आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण हिरावून घेतले - भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राज्य अध्यक्ष विजय चौधरी

अकोले येथे ओबीसी कार्यकर्त्यांचा मेळावा

   अकोले । महाविकास आघाडी सरकार हे सर्वसामान्य, गरीब, दीन-दुबळ्या जनतेचे सरकार नसून ओबीसीचे आरक्षण हिसकावून घेणारे सरकार आहे. यांना वेळोवेळी न्यायालयाने मागणी करूनही डेटा देता आला नाही. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का बसला असून यापुढे शिक्षणात, नोकरी मध्येही बसेल अशा बिघाडी सरकारला येणाऱ्या काळात जनता सत्तेपासून दूर करेल, असे वक्तव्य भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे माजी अध्यक्ष व तेली समाजाचे राज्य अध्यक्ष विजय चौधरी यांनी अकोले येथे ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.

   अकोले विश्रामगृहात अकोले तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार व अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांनी विजय भाऊ चौधरी यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, ओबीसी मोर्चाचे हितेश कुंभार, नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपसभापती दत्ता देशमुख, संतोष बनसोडे, अशोक शिंदे, निलेश सांकरे, किशोर काळे, युवा भाजप अध्यक्ष राहुल देशमुख, रमेश पाबलकर, शेखर वालझडे, गोकुळ वाघ, किरण करपे, चंद्रकांत घाटकर, देविदास शेलार, शंभर कार्यकर्ते उपस्थित होते.

Maharashtra_Aghadi_sarkar_government_took_away_the_reservation_of_OBC_-_Vijay_Chaudhary_former_state_president_of_BJP_OBC_Morcha    प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड यांनी ओबीसी समाजाचे आरक्षणाला धक्का लावू नये ही भाजपची पहिल्यापासून मागणी होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पद्धतीने ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भूमिका घेतली मात्र २०१९ मध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारने गांभीर्याने हा विषय हाताळला नाही, त्यामुळे न्यायलयाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. अकोले नगरपंचायत मध्ये ४ जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. मात्र आरक्षण हटविले आम्ही मात्र ओबीसी जागेवरील उमेदवार तसेच ठेवून निवडणूकीत ओबीसी उमेदवार निवडून आणले. यापुढेही जिल्हा परिषद पंचायत समितीत भाजप ओबीसी समाजाला न्याय देईल याची खात्री देतो. लवकरच याबाबत ओबीसी मेळावा आयोजित करून प्रश्नाची उहापोह करू. तर विजय चौधरी यांनी राज्याला देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री लाभले त्यांच्या काळात मला राज्याचे ओबीसी अध्यक्ष केले. त्यामुळे राज्यातील अठरा पगड समाज एकत्र करता आला आज राज्यातील ओबीसी समाज एकदिलाने भाजप सोबत उभा आहे.केवळ मतांसाठी ओबीसी समाज वापर करण्याची निती महा विकास आघाडी सरकारची आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार याची खात्री मी आपणाला देतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासारख्या अल्पसंख्याक माणसाला राज्यात, तसेच वैभव पिचड याना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. यापुढेही अकोले तालुक्याचे आमदार राज्यात महत्वाची भूमिका बजावतील याची खात्री देतो.

   यावेळी सीताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी, हितेश कुंभार, संतोष बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब वडजे यांनी आभार मानले.