शेतकरी आंदोलनाप्रमाणे ओबीसींना लढा द्यावा लागेल

शेतकरी आंदोलनाप्रमाणे ओबीसींना लढा द्यावा लागेल  - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार 

     नागपूर : 'मी म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे मी' अशी सगळी वागणूक असणारी व्यक्ती देशातील १३० कोटी जनतेची माफी मागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नासाठी दिलेला निकराच्या लढ्याने हे शक्य झाले. अशाच प्रकारचा लढा उभा करून ओबीसीचा आवाज काय असतो हे नागपुरातून देशाला दाखवून द्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केले.

    राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाच्या वतीने विदर्भस्तरीय वकील अधिवेशन रविवारी शंकरनगर येथील साई साभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, अॅड. फिरदोस मिा, अॅड.गणेश हलकरे,  अॅड. अभिजित वंजारी, खुशाल बोपचे, अँड. गोविंद भेंडारकर, नरेंद्र जिचकार,  अॅड. रेखा बाराहाते उपस्थित होते.

    ओबीसींचे प्रश्न लावून धरण्यासाठी ओबीसी चळवळ महत्त्वाची आहे. परंतु ती यशस्वी कशी करायची याचा स्तुतीपाठ अलीकडे दिल्लीच्या सीमेवरून घरी परतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनातून घालून दिला. आपलाही स्वभाव तसाच आहे. एकादा निर्णय घेतला तर मागे हटायचे नाही. त्यासाठी टोकाची भूमिका घेतो, असेही ते म्हणाले.

    ओबीसींना संवैधानिक हक्क प्राप्त करण्यासाठी देखील लढा द्यावा लागतो. परंतु हा समाज न्यायालयीन लढ्यासाठी पैसा खर्च करण्यासाठी तयार नसतो. त्यामुळे तो हक्कापासून वंचित राहतो. वकिलांनी संघटनेचा, समाजाचे 'थिंक टँक' बनून विधि सल्ला देण्याचे काम करावे, असे आवाहन बबनराव तायवाडे यांनी केले.

   अॅड.फिरदोस मिर्झ यांनी ओबीसी समाजातील युवकांना वकिली क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्याची सूचना केली.