संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य : नीलिमा पवार
नाशिक : शहरात होऊ घातलेल्या १५व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे सोमवारी (दि. २२) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मविप्र संचलित केटीएचएम महाविद्यालयात संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांच्या हस्ते बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. औरंगाबाद येथील चित्रकार राजानंद सुरडकर यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे.
बोधचिन्हातील संदेश
साहित्य संमेलन प्रतिक्रिया वादी नाही. हाच खरा मूळ प्रवाह आहे. क्रांतिसूर्य जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या सूर्यकुळांनी या मूळ प्रवाहाला उजागर केले. म्हणून या बोधचिन्हात प्रतीकात्मक सूर्य दाखवला आहे. लेखणीतून प्रबुद्ध पिपळपान उगवले आहे. महाकवी वामनदादा कईक, आंबेडकरी साहित्याचे भाष्यकार बाबूराव बागुल यांचे पिपळपान प्रतीक आहे. आदिवासी उलगुलानसाठी एक महिला नगारा वाजवत आहे. नांगर आहे आणि या नांगराने गुलामीच्या बेड्या तोडून टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलन व साहित्य याचे ते प्रतीक असल्याचे किशोर ढमाले यांनी सांगितले.